उपक्रमाविषयी थोडक्यात
ज्या उद्योगात नकळत देखील चूक झाली तरी मृत्यू हीच शिक्षा असू शकते अशा उद्योगातील कामगारांसाठी वीज कामगार कल्याण निधीची १० ऑगस्ट १९८६ रोजी स्वर्गीय बाळासाहेब साठ्ये ह्यांनी सांगली येथे स्थापना केली. वीज कामगाराच्या अचानक मृत्यूमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या परिवारास तात्काळ मदत दिली जावी ह्या संकल्पनेतून ह्या निधीची रुपये ५०० भरून सदस्य नोंदणी सुरु झाली. अर्थात ह्या निधीने मृत्यू – मृत्यू मध्ये फरक केला नाही. सभासदाचा मृत्यू हा अपघाती असो किंवा नैसर्गिक असो ह्या निधीतून सारखीच मदत केली जाते. तसेच ह्या निधीचे सदस्यत्व सर्व कामगार व अधिकारी ह्यांच्यासाठी खुले असल्याने पूर्वाश्रमीच्या विद्युत मंडळात आणि आताच्या विविध शासकीय कंपन्यांमधील कोणताही कामगार किंवा अधिकारी ह्या निधीचा सदस्य होऊ शकतो. आणि सुखरूप सेवानिवृत्त झाल्यास सदस्य होण्यासाठी भरलेले रुपये ५०० त्यास परत केले जातात.




